मंगळवार, १२ मे, २०२०

मनाच्याही मनातले...4) ऋणानुबंध

मनाच्याही मनातले

 4)    ऋणानुबंध
@नेहा देव 

          एका मे महिन्याच्या संध्याकाळी ती आमच्याकडे आली. माझ्या सक्त विरोधाला न जुमानता धाकटीने तिला आमच्याकडे हट्टाने आणलेच. धाकटी अशीच आहे. बेधडक, बेपर्वा. माझ्या अगदी विरुध्द!  अर्थात तिच्या वडिलांचाही तिला छुपा पाठिंबा होताच. 
          माझ्या विरोधाला कारणही तितकेच सबळ होते. मुका बिचारा जीव! खाण्या पिण्यासाठी  पूर्णपणे आपल्यावर अवलंबून राहातो. त्यामुळे  सर्वाना एकदम घराबाहेर जाता येत नाही. कोणालातरी  घरात अडकून पडावे लागते. घरात एका माणसाचे काम वाढते!!!!! आणि सर्वात  महत्त्वाचे म्हणजे तरुणपणी आपल्याला खूप  जीव लावणारे हे जीव एक दिवस जिव्हारीं खोल जखम करून निघून जातात. एकदा मी अनुभवले होते ते!!!!
          मुलीने जरी जोरात सांगितले; मी  करीन सगळे तिचे!....  तरी ते अजिबात विश्वासार्ह नाही आणि शेवटी सगळी जबाबदारी माझ्याच गळ्यात पडणार, ह्याची मला खात्री होती.
          असो. मी अगदी थंडे  स्वागत केले तिचे. दोन महिन्याची  होती वाटते तेव्हा ती. धड गोंडस पिलू नाही अन पूर्ण वाढही झालेली नाही अशी.  गाढवासारखे मोठे कांन अन चेहेऱ्यावर  बावळट भाव!!!
          सुरवातीला निग्रहाने तिच्याकडे दुर्लक्ष केले मी. पण घरापाठोपाठ माझ्याही  नकळत माझ्या मनात घुसून तिने केव्हा आपले घर केले हे मलाही कळले नाही. तद्दन हिंदी फिल्मसारखेच! आधी विरोध आणि मग chemistry जुळते, नंतर आकंठ प्रेमचं प्रेम!!!
          ती म्हणजे आमची ल्युसि!!! माझ्या ५३ वर्षाच्या आयुष्यातील हे दुसरे श्वान!
          सहवासाने निर्जीव वस्तूमध्येही जीव गुंततो बायकांचा. हे तर हाडामासाचे जिवंत प्रकरण.
          ल्युसि,लुस्मानिया, लुसमानखान,लुसोलिनी,लुसोबा(मसाबाच्या धर्तीवर) अशा फिरंगी नावांपासून  ते लुशे-घुशे, घोडे ,ढोले,बावळे, गाढवे,नकटे  अशा ग्राम्य भाषेतल्या कोणत्याही नावाने तिला पुकारायला  तिची हरकत  नसते. फारच चांगला मूड असेल तर मीनाक्षी ,राणी अशीही हाक मारली जाते. पण खरंतर माधुरी नाव तिला फारच खुलले असते. अशी सुबक ठेंगणी तरुण झाली आहे ती. डौलदार शरीर.काळी पाठ, पाठीवर  रुळणारी ऐटबाज शेपूट.काळ्या बुबुळाभोवती मधाळ रंगाचे वर्तुळ. , पण....... गाढवासारखे कांन!!! हे एकच वैगुण्य!! .... मला भासणारे. आणिक एक म्हणजे I.Q जरा कमीच!!! आमचा चिनू फारच हुशार होता. हिच्यापेक्षा!!!
           आमच्याकडे येताना आधीच्या कुटुंबातील नाव घेऊनच ती आली होती.  त्यामुळे मराठी नाव ठेवण्याची  माझी इच्छा फलद्रुप झाली नाही. (आमच्या आईकडच्या  कुत्र्याचे नाव मी चिनु ठेवले होते आणि शेजारी आलेल्या पिलाला मी हरिप्रसाद म्हणत होते..... स्वदेशीचा पुरस्कार! )
          ती घरात आली . सुरवातीचे कौतुकाचे दिवस  गेले. ती घरात  रुळली.  तिला कोणतीही शिस्त लावायची ना कोणी तोशीस घेतली कि ट्रेन करण्यासाठी कोणी कष्ट घेतले .शेवटी  आपले अधिकार आणि आपली कर्तव्ये तिची  तिनेच ठरवून घेतली.घराच्या आजूबाजूला कोणीही आले तरी भुंकून आकांत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि मांजरासारख्या चिल्लर प्राण्याला भुंकून धाक दाखविणे हा आपला  अधिकार आहे  हे ठरवून ती कामाला लागली. कधी कोणी दारासमोर आले आणि आपल्याला बोलायचे असते तेंव्हा भुंकू नको म्हटले तर  ती अजिबात ऐकत  नाही.माझ्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकून ती जणू म्हणते, " ए बाई माझे काम करू दे मला. हा माझा प्रांत आहे. तू नको ढवळाढवळ करुस." .....   मी मग माघार घेते.
         अशीच एकदा पहाटे मी व्यायामासाठी बाहेर पडले, तर समोरून रस्त्यावरचे भटके कुत्रे आडवे गेले. ल्युसीचा पारा अस्मानात गेला.   भुंकून भुंकून  सगळी गल्ली  दणाणून सोडली तिने. तेव्हापासून दररोज सकाळी न चुकता ती गेटपाशी थांबते. मी कोपऱ्यावरून वळून दिसेनाशी होईपर्यंत दक्ष राहून भुंकत राहते..... ....माझ्या बाईंना कोणीही त्रास दिलेला मला खपणार नाही असे जणू ती आपल्या भाईबंदांना बजावत राहते. तिचे हे संरक्षक कवच मला खूप सुखावते. असे protection  केवळ आईकडूनच  आपल्याला मिळत असते.
          ल्युसि  इतकी प्रेमळ आहे कि आम्ही काही खायला  दिले तर आम्हाला स्वतःचा दात लागू नये म्हणून ती आटोकाट काळजी घेते, अलवारपणे ती वस्तू पकडण्याचा प्रयत्न करते
          तिला मी कधीही मारलेले नाही, मारतही नाही  (पार्श्व भागावर कधीतरी एक दोन चापट्या सोडून). पण मी नुसते  "काठी!!!" असे म्हणताच ती कांन पाडून आपल्या गटांण्या डोळ्यात सखाराम गटणे  पेक्षाही  ओशाळवाणे  भाव आणून ... .. माझे चुकलेच...  असे सुचवत निघून जाते.
          माझ्या धाकट्या मुलीची आणि नातीची ती खेळगडी आहे. त्यांच्याशी खेळताना  गरीब गाईहूनही गरीबपणाने ती वागते. तेंव्हा वाटते गायीच्या ऐवजी चुकून कुत्र्याच्या जन्माला आली ती. आतापर्यंत कोणालाही ती कधीच चावलेली नाही. जणू आपल्या दातांचे दुसऱ्याला चावणे  हे काम ती विसरूनच गेली आहे.
          दिवसभर घरात, बागेत घुरु घुरु फिरल्या नंतर  रात्री  दहाच्या सुमारास मात्र मी "चला !!!!" असे म्हणताच इच्छा नसतानाही घर राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी ती धडपडत उठून बाहेर निघून जाते!!!  मला भरून येते.!!!
          असे कसे हे प्राणी असतात? काय त्यांची psychology  असते? काय त्यांची mentality  असते?केवळ दोन वेळचे पोट भरेल इतके अन्न , सहवास आणि थोडेसे प्रेम याव्यतिरिक्त  चौथी  काहीही मागणी  नसते त्यांची. या अत्यल्प मागणीच्या मोबदल्यात ते त्यांचे आख्खे आयुष्य अक्षरश: आपल्या पायावर कुर्बान करतात.  
          कधीतरी कोण्या लेखकाचे एक वाक्य मी वहीत नोंदवून ठेवले होतें. ते आता माझ्या मनावर कोरले गेले आहे. पुन्हा पुन्हा मला ते  appeal   होत राहाते ,"The More I see Men ,The More I Like Dogs!".
          इतका खरेपणा,इतकी नितळ प्रेम भावना,  इतके ईमान, इतकी माया, इतकी एकनिष्ठता, इतके unconditional  प्रेम माणसात आढळते? .... ....असेल पण  अभावानेच !  बहिणाबाई उगीच नाही म्हणत.. "पाहुनिया माणसाचे व्यवहार खोटे नाटे ,तेव्हा बोरी बाभळीच्या अंगावर आले काटे."
          तिच्याशी जुळलेल्या या अनामिक भावबंधाच्या ऋणातून मी कधीच उतराई नाही होऊ शकत. तिची पण ती अपेक्षा नाहीच. आम्ही दोघीही अशाच एकमेकांशी बांधलेल्या!!! ऋणानुबंधाच्या घट्ट मारलेल्या गाठीने.
    .......टेढी है पर मेरी है !!!!

@नेहा देव

शुक्रवार, ८ मे, २०२०

मनाच्याही मनातले...3) ग्रहण


3)  ग्रहण


         नेहा देव
 कोविड १९ च्या lock down चे सुरवातीचे दिवस. अचानकच अंगावर चालून आलेले घळघळीत रिकामपण. उद्दीष्टहीन चाललेला मोबाईलवरचा चाळा. you tube चे व्हिडिओ नजरेसमोरून घरंगळत जात होते. नजर एका नाटकाच्या शीर्षकावर स्थिरावली. नकळतच मी व्हिडिओ on  केला.  नाटक होते "काचेचा चंद्र" कलाकार शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर. मंतरल्याप्रमाणे   पूर्ण नाटक एका जागी खिळून ,एका बैठकीतच बघून घेतले . नाटक संपले! मन विषणण ,उदास झाले. संताप,क्रोध,द्वेष,तिरस्कार,खेद,शिसारी,घृणा.
 तमाम नकारात्मक भावनांनी मन ओथंबून उतू गेले.
          हे अक्षर अन अक्षर असेच घडले होते, जेंव्हा मी ते नाटक प्रथम बघितले होते.
          ती रविवारची सैलावलेली निवांत दुपार होती.कामाचा नियोजित कोटा समाधानकारक रित्या उरकून T.V.  समोर लवंडण्याचा प्लॅन  होता. रिमोट हातात घेऊन सहजच चॅनेल्स फिरवली.  तेव्हाही असाच अचानकपणे तो "काचेचा चन्द्र" समोर आला होता अन तेव्हाही विश्रान्ती सोडून एका बैठकीत तो बघितला होता.
असेच मन विषणण,उदास झाले होते. तोच संताप,तोच क्रोध,तोच द्वेष, तोच तिरस्कार, तोच खेद,तीच शिसारी आणि तीच घृणा.
उस्फूर्त  भावनांचा हा कल्लोळ  हे त्या साहित्यकृतीचे यश मानायचे कि अशी कथा हे माणुसकीचे अपयश समजायचे?
त्या नाटकांमागोमाग अनिवार्यपणे येणाऱ्या  अनावर भावनांच्या ज्वाळा.  हे सगळे असेच घडणार हे माहित असूनही दुसऱ्यांदा ते  नाटक मी का बघितले?प्रश्न अनुत्तरित राहणार हे माहित असूनही  हा प्रश्न मी स्वतः:ला विचारलाच.

काय आहे या नाटकात?
         कथेचा प्लॉट असा. ---गरीब ब्राह्मण  कुटुंबातील सोज्वळ साधी- भोळी मुलगी. संयोगाने, शाळेच्या मास्तरांच्या शिफारसीमुळे  नाटक सिनेमाक्षेत्रात प्रवेशते. तिच्या साथीला (खर तर  राशीला) असतो एक  नाकर्ता, सावत्र भाऊ. तिचे शक्य त्या सर्व प्रकारचे शोषण तो करत राहतो.
तिची वाताहत होत राहते. ती उध्वस्त होत राहाते . कोसळतच जाते. ..... मन शत शत विदीर्ण करणारी ही  शोकांतिका. 
           तोच अनुत्तरित करणारा प्रश्न-- मी ते नाटक परत का बघितले?
काय अनुभवण्यासाठी? माणूस पैशासाठी असंही  करू शकतो हे बघण्यासाठी??
जगात असं घडू शकत? पैसा पैसा पैसा!!!! हा पैसा ही  काय चीज आहे? हे काय गौडबंगाल आहे?
असेल!!!! अस घडतही असेल!!! या जगात काहीही घडू शकते!!!  
         वास्तवातून प्रेरणा घेऊन साहित्य घडते. साहित्यातून प्रेरणा घेऊन वर्तन घडते.
वास्तव-कल्पना-भावना-प्रेरणा-वर्तन आणि त्यातून उदयाला येणारे अपरिहार्य वास्तव.  बिंब आणि प्रतिबिंब.
वास्तवापासून सुरु होऊन वास्तवापर्यंत येऊन ठेपणारे  भास आभासाचे हे  वर्तुळ.
आणि अपरिहार्यपणे त्या भोवऱ्यात गरगरणारे आपण क्षुद्र जीव जंतू. 
  तो तिचा भाऊ (सावत्र ) असा का वागला?
  ठीक आहे असा प्रसंग होऊ शकतो ,असेही घडू शकते पण लेखकाने ते साहित्यात उतरवलेच का?
  ठीक आहे नाटककाराने  ते लिहिले पण कलाकारांनी ते स्टेज वर आणलेच का? ते ही  शरद पोंक्षेनि? त्यांच्या
  सारख्या बाप माणूस  कलाकाराने व्हिलन साकारलाच  का?
  ठीक आहे त्यांनी नाटक  केले पण मी ते पाहिले तरी का ?
  एकदा पाहिले  ते पाहिले.  पण मग दुसऱ्यांदा पाहिले तरी का? का??
 या विकृत भावनाचेही एक आकर्षण असते का? कि आपण असे वागायचे नाही असे स्वतःलाच बजावण्यासाठी आपण ते बघतो?
कि एक केवळ साहित्य कृती म्हणून ते बघतो? कि तो अनुभव घेतल्यावर आपल्या मनातील वाईट भावनांचा   आपण निचरा करून घेतो?कि आपल्या चांगुलपणावर आपणच शिक्कामोर्तब करून घेतो?
कोणते उत्तर बरोबर? कि सर्वच उत्तरे बरोबर ? कि कोणतेच उत्तर बरोबर नाही?
अनुत्तरित प्रश्न......
तुम्हाला उत्तर सापडल्यास मला द्याल??????
   ©नेहा देव 

मनाच्याही मनातले ...2) मनाच्याही मनातले ..

2) मनाच्याही मनातले .. 



मनाच्याही मनातले...
थंडकाळ्या गाभ्यातले...
खोल काही गुंतलेले...
खूप काही गाडलेले...
नकळताच दाबलेले...
ते उसासे! ते उमाळे!
अमूर्त ते! नि;शब्द तें !
कोंब ते जाणिवांचे
अस्फुटश्या भावनांचे
अव्यक्त त्या संवेदनांचे 
शब्दांच्या आवरणातून ...
उमटण्यास उत्सुकलेले ...
उमलण्यास आसुसलेले
बहरण्यास आतुरलेले...
मनाच्याही  मनातले ...
मनाच्याही मनातले .......
©नेहा देव 

गुरुवार, ७ मे, २०२०

मनाच्याही मनातले...1). जाळीखालचा खजिना

मनाच्याही मनातले.

नेहा देव 

१. जाळीखालचा खजिना

               वय किती होते माझे? स्पष्ट आठवत नाही.पण मनाची माती तेंव्हा चांगलीच ओली असावी.म्हणूनच या प्रसंगाचा,त्या भावनेचा खोल ठसा अजूनही लख्ख लोलकासारखा  प्रकाशतो आहे.
               आमच्या लोकमान्य नगरच्या कोपऱ्यावरच्या  बिल्डिंगच्या टोकाला एक उघडी, उजाड बाग होती.त्या फ्लॅटमधले रहिवासी येऊन अजून स्थिरावले नव्हते. त्यामुळे उघडी बोडकी ती बाग अर्धवट स्थितीमध्ये बिचारी पडून होती. भिंतीच्या बाजूला जमिनीवर जाळीचे कंम्पाउंड होते, उभारले जाण्याच्या प्रतीक्षेत उताणे पडले  होते.
                तेंव्हा मुलांना रिकामा वेळही बराच असायचा. ( कसे काय? मला हे कोडे अजूनही उमगले नाहीये. तेंव्हा तास, मिनिटे यांचा span   खरंच जास्त होता का? तेंव्हा मिळणारा  तो leisure time  गेला तरी  कुठे?)
               तर त्या रिकाम्या वेळेत इकडे तिकडे मनसोक्त  हुंदडण्याची मुभा होती. त्या जमिनीवर पडलेल्या जाळीच्या खाली डोकावून बघण्याची अकारणच बालसुलभ हुक्की आली. त्यात डोकावून बघताच माझे डोळे लकाकले. मला  काहीतरी अद्भुत तिथे गवसले . गुलाबाच्या नाजूक रोपट्यावर एक इवलीशी कळी  जाळी आडून मला खुणावत होती.
ती इवलीशी लाल गुलाबी अर्धोन्मीलित कळी!!!!!
अरे!!!!
गुलाबाचे रोप!
त्यावर गुलाबी कळी !!!
ती उदयाला उमलणार!!!!
आणि हे फक्त मला आणि मलाच ठाऊक आहे!!!
तो फक्त माझा खजिना आहे.!!!!!
तो अद्भुत आनंद, ते अप्रूप
अजूनही अजूनही स्मरते--- भासते तितकेच रम्य,सुरम्य ! तितकेच रम्य.सुरम्य !!!!
...............आणि आज.....आता?
आता शम्भर/दोनशे/चारशे रुपये देऊन मी भरपूर रोपे आणू  शकते,तितकीच फुलेंही सहज आणू शकते. खरी खरी आणि  खऱ्यासारखी भासणारी खोटी!खूप  महागडी सुद्धा!! बागेसाठी भरमसाठ खर्चही करू शकते.
पण त्या दिवशीचा ,त्या क्षणाचा तो बालसुलभ, निर्व्याज, निष्पाप, निखळ आंनद ?
बिन पैशाचा . पण लाखमोलाचा! --- नव्हे  अनमोल. तो अनमोल खजिना गेला कोठे ?
कोण देईल परत आणून?

कोई लौटा दे मेरे बिते हुए दिन !!!!

©नेहा देव 

.