शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

मनाच्याही मनातले ...9) दृष्टी तुझे कोन हजार........

मनाच्याही मनातले -9) दृष्टी तुझे कोन हजार.........
लॉकडाउनच्या काळातील संकष्टी चतुर्थी. गणपतीच्या अभिषेकासाठी सामानाची जुळवाजुळव करत होते. दुर्वा मिळेनात. फुलांची दुकाने बंद!!  घरच्या बागेत दुर्वा का कोण जाणे वाढत नव्हत्या.घराच्या कुंपणाला लागून पलीकडील  शेजाऱ्यांकडे  जाऊन विचारून पाहू म्हटले. या शेजारीणबाई येता-जाता दिसल्यातर कामापुरते  बोलणाऱ्या. पण आमचे फारसे सख्य नाही ....पण भांडण सुद्धा नाही. तरीही एकमेकांच्या घरी जाणे येणे तसे सहसा नाहीच. निरुपाय म्हणून त्यांना विचारले.... दुर्वा आहेत का? त्यांनी या आणि घ्या म्हटल्यावर मी लगेचच त्यांच्याकडे गेले. दुर्वा तोडता तोडता सहजच वर मान वळवली. आमच्या  घराकडे बघितले.........अरेच्या किती  वेगळे दिसत होते आमचे घर!!!....... ज्या घरात मी आयुष्यातील ३१ वर्ष घालवली  ( हो प्रदीर्घ ३१ वर्ष ......) , ज्यातील प्रत्येक कानाकोपरा माझ्या ओळखीचा आहे , तेच आमचे  घर मला त्यांच्याकडून बघताना किती वेगळे दिसत होते !!!
खरच हे आमचेच घर ना?
मग मला ते वेगळेच  का दिसते आहे?..........
हं.........माझ्या लक्षात आले. 
मी या कोनातून कधीच बघितले नव्हते !!!......कोन बदलला होता 
अँगल ...कोन......दृष्टी ....नजरिया ......
माझा पाहण्याचा कोन बदलला आणि काही वेगळेच लक्षात आले.
हा तर केवळ बाह्यांगी कोन झाला. 
आपल्या अंतरंगातही असतात .....असेच कोन .....हजार .... 
कोणीतरी म्हटले आहे.........
आम्हास आम्ही पुन्हा पाहावे ....काढून चष्मा डोळ्यावरचा.....
अहं ........ नुसता चष्मा काढून नाही. .....
कोन सुद्धा बदलून बघावेच ......
वेगळेच काही लक्षात येते.
एकतीस वर्ष ... किती प्रदीर्घ काळ......
आठवले ते सुरुवातीचे दिवस.....
२२ वर्षांची होते मी तेंव्हा ......जेंव्हा लग्न होऊन या घरात आले....जीवनाबद्दल, जोडीदाराबद्दल कधी काही विचारच केला नव्हता....अज्ञानी , अर्धवट, ना कळते वय.....हे घर "आपले" हे पचवून घ्यायला खूप काळ लोटावा लागला. 
अगदी काल परवा पर्यंत स्वप्न पडले की  घर म्हणून  लोकमान्यनगरमधील अडीच खोल्यांचेच  घर उभे राहायचे ......स्वप्नात सुद्धा...... ...
subconscious mind मध्ये घराची कल्पना फिक्स होती ......... लोकमान्यनगरमधले अडीच खोल्यांचे घर हे माझे घर ........
हे आताचे घर तर त्यांचे होते.......सासू - सासऱ्यांचे....त्यांनी काटकसर करून खूप मेहेनतीने बांधलेले....माझे  कुठे.होते ते?.....
अनेक जण म्हणायचे... अजूनही म्हणतात ...काही न करता आयते घर मिळाले हिला .....आमच्यासारखे झगडावे नाही लागले!!!.....म्हणोत  बापडे !!!!..
ज्याचा त्याच्या दृष्टीचा कोन......... हे घर आपले म्हणून घेताना तेवीस वर्षे जो मानसिक झगडा पेलला  तो कोणाला कसा कळणार? लग्न होऊन सासरी आलेल्या प्रत्येक स्त्रीला हा झगडा सोसावाच  लागतो.
ज्याचा त्याचा दृष्टीचा कोन........
असेच आठवले...
वैदेही लहान होती ...कौतुकाची लाडाकोडाची  पहिली मुलगी.... नीटस देखणी ...
तिचा प्रत्येक वाढदिवस आजूबाजूच्या मुलांना बोलवून मी थाटात  करायचे. 
आपल्या वाढदिवसाची खूप अपूर्वाई असते मुलांना . 
चार मुलांमध्ये कौतुक झालेले त्यांना खूप आवडते. 
तो दिवस त्यांचा आणि फक्त त्यांचा असतो.  आपल्या  मित्र मंडळींनी दिलेल्या  पाच- दहा रुपयाच्या  छोट्या छोट्या प्रेझेन्टचे पण त्यांना खूप  अप्रूप असते.... 
तिच्या वाढदिवसाच्या  दिवशी सहजच मनात लहानपणी शिकलेल्या गीताच्या ओळी उमटायच्या....  
"दीपका  मांडिले तुला सोनियाचे ताट, घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ, दारी आलेल्याची करू सोपी पायवाट." 
असाच एक वाढदिवस -.....श्रीखंड पुरी,छोले,कैरीची डाळ आणि केक.....आणि पन्हे केले होते कि रसना आता आठवत नाही.पण  मस्त  बेत केला होता.  घर सजवले,वैदेहीला नवा फ्रॉक, मॅचिंग दागिने घालून तयार केले., मोगऱ्याचे गजरे तर मी आणायचेच ..........
तेंव्हा भरमसाट खर्च  करायला पगार कुठे भरपूर  होता?
पण या दिवसासाठी मात्र मी तडजोड करायचे नाही.... जे असेल त्यातून जास्तीत जास्त नेटके ,साजरे करायचा प्रयत्न असायचा माझा..... सासू -सासरे तर त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी असायचे आणि एरवी त्यांच्याकडे असणारी वैदेही, मे महिन्यात  मात्र माझ्या जवळच असायची....आई पण न चुकता यायचीच वैदेहीच्या वाढदिवसाला. 
वाढदिवस झाला. मुले खुश होऊन पोटभर खाऊन गेली. वैदेही मजेत होती....दिवसाचे सार्थक झाले असे वाटले. 
शेजारीच एक भाडेकरू त्यांच्या दोन मोठ्या मुलांसह राहत होत्या. त्यांच्याकडेही खाऊ दिला.. .
दुसऱ्या दिवशी सकाळी या शेजारीण बाई मोलकरणीशी बोलताना मी ऐकले...........
"काल मुलीचा वाढदिवस केला.... हं ..आहेत  पैसेम्हणून उडवतात.........."
मी अवाक!!!!!....पैसे उडवतात?
अरेच्या !!!  हा अँगल माझ्या लक्षातच आला नव्हता. ........हं .........हा त्यांचा दृष्टिकोन ....
खरे तर मुलांचा वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक अभिनव पद्धती असतातच.... पण त्या वयात पहिल्यांदाच  आई झालेल्या मला तो मार्गच योग्य वाटला होता. पण इतरांच्या दृष्टिकोनातून तो तितकासा काही  बरा नव्हताच.......
आपल्या गाढवाला बाजारात घेऊन जाणारा एक म्हातारा आणि त्याचा नातू यांची कशी फरफट झाली होती..... इतरांच्या दृष्टीचा विचार करता करता.... हे आठवले............
मग आपण का करायचा इतका विचार ? 
पण तरीही ......
नंतरच्या तिच्या वाढदिवसाच्या वेळी माझ्या  मानसिकतेवर परिणाम झाला हे मात्र नक्की.
ज्याचा त्याचा दृष्टिकोन..........या दृष्टीचा  कोन ओठात शब्द होऊन येतो . शब्दाचे बाण  होतात आणि एकदा फेकलेले बाण कधीच परत घेता येत नाहीत...ते  बाण जिव्हारी कायमची  जखम मात्र करून ठेवतात..
अशा असंख्य जखमा हृदयात लपवता लपवता कधीतरी उघड्या होतातच माझ्याकडून ......
तर... हा दृष्टीचा कोन... कोन जेवढा लहान करू तेवढा लहान होतो..... जेवढा मोठा करू तेवढा मोठा होतो.
जर सगळ्याच गोष्टीकडे लघुकोनातूनच पाहायचे म्हटले तर सगळे खुजे खुजेच दिसते. ......म्हणतात ना.. ज्याचे त्याचे विश्व् किती मोठे? ज्याच्या त्याच्या मेंदूइतकेच.
अर्धा  भरलेला पेला........   कोणाला तो "अर्धा भरलेला" दिसतो, कोणाला तो "अर्धा रिकामाच" दिसतो.....पण सरळ वरतून जर बघितले तर?......... कदाचित पूर्ण भरलेला दिसेल............
"'कोन"'  बरं... हा "कोन" ...हा कोनचं आपल्याला भ्रमित करतो.......... .....
माझ्या आईचा या बद्दल एक आवडता शब्द होता. "दोष-ऐक" दृष्टी ...आपण प्रत्येक गोष्टीकडे  "दोष-ऐक" दृष्टीने  बघितले तर दोषच दोष नजरेला पडतात. म्हणून नितळ ,निखळ, शुद्ध नजरेनेच पाहावे जगाकडे.
हा  कोन  प्रकाशाच्या सगळयाच खेळांना कारणीभूत असतो. त्यांना आपण परावर्तन , अपवर्तन ,अपसरण आणि कितीतरी वेगवेगळी शास्त्रीय नावे  देऊन अभ्यासण्याचा प्रयत्न  करतो. पण ते खेळ प्रत्यक्ष अनुभवण्यात  खरंच गम्मत असते. 
साऱ्या  सृष्टीमधील  असंख्य रंगांच्या मागे या प्रकशाच्याच कोनांचा- शोषण आणि  परावर्तनाचा खेळ असतो. आरशात दिसणारे आपले प्रतिबिंब,वक्र पृष्ठावरून दिसणारे विनोदी रूप, भिंगातून दिसणारे... वेगळेच बारकावे ...वेगळेच जग..... ,अवकाशातून निळसर दिसणारी पृथ्वी .......पांढऱ्या रंगातून उलगडणारे सप्तरंगाचे इंद्रधनु  हा प्रकाशाच्या विविध माध्यमातून प्रवासाचाच  एक खेळ ......मृगजळ हा सुद्धा असाच  खेळ....  आणि कितीतरी ........
अगदी तसेच  आपल्या अंतरंगातील दृष्टीचे हजारो  कोन  आपल्या  मनामध्ये खूप  काही खळबळ माजवतात ....असंख्य  भावनांचे रंग आणि तरंग उमटवतात....समज- गैरसमजांची आवर्तने घडवतात .......आणि भावनांच्या अनेक पदरांचा होऊन बसतो एक निरर्थक गुंता !!!!
 अंत:करणात पडलेल्या गाठी- निरगाठी यांचा हा गुंता सोडवायचा  असेल तर एकच उपाय आहे ...........दृष्टीचा कोन शून्य करा....... कोणतेही  भिंग किंवा चष्मा वापरू नका ......
आणि 
मग सहजपणे  ओठात येईल ............
"रुठे ख्वाबोन्को मनावेंगे......कटी पतंगको थामेगे.....हा हा है  जज्बा.. .हो.हो.. है  ...जज्बा 
सुलझा लेंगे उलझे रिश्तोन्का मांझा .... हो  मांझा ...  .....हो मांझा ...  हा हा हो.. मांझा !!!!. " 
©नेहा देव