मनाच्याही मनातले......................................
10)गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या............
गायी पाण्यावर काय म्हणुनी आल्या .....
का ग गंगा यमुनाही या मिळाल्या...
उभय पितरांच्या चित्त चोरटीला .............
कोण माझ्या बोलले गोरटीला.........
शाळेत असताना अभ्यासलेली ही कविता!.....याच कवितेमध्ये पुढे “छबेलीला” असाही शब्द होता असे आठवते.
यातला छबेली हा शब्द फारच गमतीचा वाटला होता तेंव्हा.
आता हे ‘गायी पाण्यावर येणे’ हे काय प्रकरण आहे हे आत्ताच्या पिढीतल्या कोणत्याही मुलाला सांगता येणार नाही हे मी पैजेवर सांगू शकते.
गायी पाण्यावर येणे म्हणजे डोळे भरून येणे.....लहान मुलांना झोपवताना आपण "हम्मा गायी…….' अंगाई म्हणतो... त्याचा संबन्ध डोळ्यांशी.. म्हणून कवीने ही शब्द रचना केलेली असावी .....हा माझा तर्क........ त्या डोळ्यात पाणी का भरले???
गंगायमुनाही मिळणे म्हणजे अश्रू दोन्ही डोळ्यांमधून गालावर ओघळणे.........
एका दरिद्री पित्याची गोड, गोंडस, गोबरी लेक ...तिचा तिच्या गरिबीवरून कोणीतरी अपमान करते…….मानी मुलीला ते फारच झोंबते आणि डोळे काठोकाठ भरून येतात…… अश्रू बांध फोडून वाहू लागतात…….
पैशाने गरीब पण शब्दाने श्रीमंत पिता तिची समजूत काढतो, तिला हसवण्याचा प्रयत्न करतो .....ती ही कविता.
हं……..लहानपणी डोळे भरून यायलाही अर्थ असतो....... त्याची कदर करणारेही कोणी असते..... ही केवढी मोठी दौलत असते.....
आता मला त्या मुलीचा फारच हेवा वाटत राहातो......
अलीकडे माझेही डोळे असेच वरचेवर भरून येतात….. पण आता असे मायेने विचारपूस करणारे, समजूत काढणारे कोणीच उरले नाही.....बाबाही नाहीत आणि आईही नाही....
आता या डोळ्यात अश्रू भरून यायला काही अर्थच उरला नाही......
कोणी म्हणेल हा वयाचा परिणाम…… या वयात बायकांना असे काहीतरी होत राहाते......hormonal changes ...
असेल…. कदाचित तसेही असेल.... पण मला जसे होते तंतोतंत तसेच संदीप खरेलाही का बरे झाले असेल?.....तो तर माझ्या पेक्षाही लहान आणि एक पुरुष ....त्याला का बरे असे होतें?.
आताशा मला हे असे काय होतें....
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते...
आताशा मला हे असे काय होतें...........
या कवींचे एक बरे असते आपल्याला काय होतें हे ते अगदी अचूक मार्मिक पणे शब्दात मांडतात. मग आपण आपल्या भावनांचे प्रतिबिंब त्यात शोधतो.
थोडक्यात संदीप खरेला जे जाणवते तसेच मलाही आता आत... मनात... काही आर्त जाणवत राहाते…….....आणि गायी पाण्यावर येतात...... कधी कधी गंगा यमुनाही त्यात मिळून जातात. पण समजूत काढणारे कोणीच नसते.....
एक मोठा अश्रू….. आई बाबांची कोणतीही सेवा न करू शकल्याचा... ...
आईच्या भेगाळलेल्या पायांना कधी तेल लावले नाही…. तिचे दुखणारे पाय कधी चेपले नाहीत.......तिला कोणा कडून सेवा करून घेणे माहीतच नव्हते.... आवडतही नव्हते....
एक टपोरा अश्रू…..मुलीना मनापासून वाढवू न शकल्याचा....त्यांच्या वाढीच्या वयात शिक्षण आणि नोकरी यांच्या मागे दमछाक होईपर्यंत पळत राहिल्याचा....
एक अश्रू पन्नाशी उलटूनही हातून म्हणावे तसे काही substantial , ठोस असे काही काम न घडल्याचा .....
एक अश्रू .......कामाच्या ठिकाणी विनाकारण होणाऱ्या अवहेलनेचा....
एक अश्रू ……. भावंडांच्या हुशारीचे चीज न झाल्याचा.........प्रामाणिक पणा, बुद्धिमत्ता असूनही त्यांना नशिबाने साथ न दिल्याचा......
एक अश्रू लाडक्या चिनूसाठीचा ......त्याच्या म्हातारपणात, आजारपणात फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा ...
एक अश्रू… ..काही जवळचे गैरसमज करून दूर निघून गेल्याचा...
एक अश्रू ……आजू बाजूला वावरणाऱ्या अनेकांच्या मनातल्या जाती भेदाच्या विषासाठीचा ...
एक अश्रू….. नतद्रष्ट समाजकंटकांच्या कृत्यांना आपण कोणताच विरोध करू शकत नसल्याच्या असहायतेचा……
अनेक अश्रू …..दुःखी पीडितांसाठी खूप काही करावेसे वाटते पण हातून काहीच घडत नाही... यासाठीचे…
आणि असेच....... बरेच काही....... थेम्ब थेम्ब .....काही पश्चात्तापाचे....काही असहायतेचे............ काही रागाचे............. काही विषादाचे......... काही खेदाचे........... अश्रूंचीही विविध नावं...... पण रूप मात्र एकच.............. सगळेच अश्रू एकमेकात मिसळलेले......... अश्रू.......मनातील निखळ भावनांची प्रतीकं........ की फलितं?
अश्रू येतात आणि वाहून जातात….. अनेकदा…. वरचेवर…..
त्या अश्रुनी मग चष्म्यापुढे धुके धुके जमा होऊ लागते...मग पुढचे काहीच दिसेनासे होतें………
......आणि मागेही कोणीच नसते.........
पण आशा वाटते …..आता उलटे काही घडेल ….....
लेकीची समजूत काढणारा पिता त्या कवितेमध्ये होता तर माझे अश्रू
लडिवाळपणे पुसणारा एक बाळकृष्ण (का कृष्णा?) मागून गळ्याला मिठी घालेल........ आपल्या गोड बोलांनी मला हसवेल...
नक्कीच….... कोणी येईल ... मी वाट बघतेय......
माणूस आशेवरच तर जगतो .......आणि मी ही..... ...