बुधवार, ३ जून, २०२०

मनाच्याही मनातले... 5) बावीस

मनाच्याही मनातले....
         5)   बावीस
           बावीस हा  दिसताक्षणी आवडेल असा काही आकर्षक आकडा नाही.
 बावीस हा काही माझा लकी नंबरही नाही. माझा जन्मदिनांकही नाही. आमच्या पैकीं कोणाचाच नाही. किंवा तो काही खास पासवर्ड किंवा कोडवर्डही नाही.एखाद्या  कमनीय ललनेच्या मापाशीही हा संबंधित नाही.
पण या  नम्बरचे आमच्या लहानपणाशी बरेच काही बंधअनुबंध जुळलेले आहेत.
आमच्या चारही भावंडांच्या लहानपणातील आयुष्याचा बावीसच नव्हे  तर चव्वेचाळीस टक्के भाग या बावीस नंबरने व्यापला होता.
           लोकमान्यनगरमध्ये आमच्या बिल्डिंगचा नंबर होता नऊ आणि आमच्या समोरची बिल्डिंग सोडून दोन बिल्डिंगच्या नंतर एका   छोट्याश्या  चौकांच्या पुढे  होती ....बिल्डिंग  नंबर  बावीस.... 
आता इथल्या बिल्डींग्जना कोणत्या क्रमाने असे नंबर दिले होते, हा एक मोठा संशोधनाचा विषय  ठरू  शकतो.
          उच्च शिक्षण घेताना संशोधन या विषयाशी  ओळख झाली आणि त्यात random--यादृच्छिक  ही नवी संकल्पना कानावर पडली. random -यादृच्छिक म्हणजे नेमके काय याचा प्रत्यक्ष अनुभव लोकमान्यनगरच्या बिल्डिंगना  दिलेले नंबर  ज्या क्रमाने  दिले आहेत त्यावरून कोणालाही पटकन समजेल. 
          कोणताही ठराविक नियम न पाळता अक्षरशः मनाला वाटतील त्या पद्धतीने या बिल्डींग्सना नंबर दिलेले होते. नवागतास पुरेपूर गोंधळात टाकून वांच्छित पत्याचा पत्ता लागू द्यायचाच नाही असा बहुधा बिल्डरने  चंग बांधला  असावा .
          तर बिल्डिंग नंबर  बावीस.... या मध्ये आमची मावशी तिच्या तीन मुलींबरोबर रहायची. परिस्थितीची गरज म्हणून मावशी नोकरीला जायची. मग दिवसभर त्या तीन मावसबहिणीसह तो बावीस नंबर मधील तीन खोल्यांचा आख्खा ब्लॉक आमच्या  ताब्यात असायचा . तो म्हणजे आमच्या सर्व भावंडांचा मुक्त पणे खेळायचा अड्डा असायचा.
          त्या बावीस नंबरने  वेगवेगळ्या प्रकारे आमचे लहानपण समृद्ध केले. .
          मावशीचा स्वयंपाक मस्त मसालेदार असायचा. तिच्या हातच्या  आमटीची , वांग्याच्या भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आमच्याकडे  घरी आज्जी, बाबा यांच्या सततच्या आजारपणाने पथ्याचाच  स्वयंपाक  असायचा. मला पहिल्यापासून मसालेदार चमचमित जेवणाची आवड. पण आई ते काही करू शकत नसे. आमच्याकडे तेलाची इतकी टोकाची काटकसर असायची की जास्त तेल एकावेळेस आणले तर आई भराभर जास्त वापरून संपवेल म्हणून अक्षरशः दर  दोन- तीन दिवसांनी अर्धा - पाव किलो तेल आम्ही मुलेच आणायचो. (माझी ही मसालेदार तेलकट खाण्याची आवड आईने मनात ठेवली होती आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही याची खंतही.... माझे लग्न झाल्यानंतर एक दिवस आईकडून डबा घेवून जायची वेळ आली होती. कॉलेज मध्ये गेल्यावर डबा उघडला आणि पाहिले तर भाजी तेलाने आणि पोळी तुपाने ओथंबली होती.. ...आणि माझे डोळे पाण्याने....... )
          तर या बावीस नंबर मध्ये मावशीच्या हाताचा चमचमीत स्वयंपाक हे एक आकर्षण होतेच.
दुसरे म्हणजे,मावशीने वाचनालय लावले होते. तिच्या घरी मासिके, कादंबऱ्या असायच्या.
त्या काळात कोणताही लेखी चिठोरा लेखकाने माझ्यासाठीच लिहिला आहे आणि तो न वाचला तर पाप लागेल अशा   भावनेने  मी अक्षरश:जे मिळेल ते वाचत सुटायचे. त्या अर्धवट वयात जे वाचायला हवे ते आणि नको असेही. त्यामुळे जरा लवकरच शहाणपण आले होते. बाकीचे सर्व खेळात रमलेले असताना मी मात्र अनेक वेळा पुस्तकात डोके खुपसून बसलेली असायची.
      तर माझ्यासाठी ते एक मोठे आकर्षण होते .पुस्तके,मासिके,वर्तमानपत्रे असा बराच खजिना.
परीक्षेच्या काळात अभ्यास आम्ही इथेच करायचो. रिकामपणाचे खेळ आणि इतर छंदही  आम्ही इथेच जोपासले.तिथेच आमचे पत्ते,कैरम,सागरगोटे, भातुकली, लपाछपी असे तमाम खेळ चालायचे. तेव्हा दूरदर्शन (आपला T .V ) नुकतेच  अस्तित्वात आले होते.  आमच्या आधी मावशीकडे T .V .आला होता. तेव्हाही श्वेतांबरा,छायागीत बघण्यासाठी आम्ही तिच्याकडे तळ ठोकून  असायचो ,असे स्मरते . 

आमची आई अतिशय मवाळ.ती चुकूनही कोणाला आवाज चढवून  रागावलेली मला  आठवत नाही.
त्या मानाने मावशी भलतीच कडक ! फटकन रागे भरायची!!
 तिची जरा भीती वाटायची पण ती नसताना आम्ही तिच्या घरात मुक्तपणे वावरायचो.
तीच ही नंबर बावीस.......
आमच्याकडे नऊ नंबरच्या अडीच खोल्यामध्ये मूळची सात ,अधिक  दीर्घ काळ राहावयास आलेला चुलत भाऊ ,अधिक काहीनाकाही निमित्ताने येणारे काका, आत्या, इतर नातेवाईक असे एकावेळेस दहा- बारा लोक  सहज असायचे. मग साहजिकच अडचण ही असायचीच. तेव्हाही हे मावशीचे घर म्हणजे आमची आधाराची गोष्ट असायची. आमच्या घरच्या  अडीअडचणीच्या वेळी रात्री झोपायला जाण्याचीहि ती हक्काची जागा होती.
आई आणि मावशी दोघीही बहिणी भिन्न स्वभावाच्या असल्या, तरी त्यांच्यात खूप सख्यं होते . अडीअडचणीला दोघीही एकमेकींना मदत करायला, सावरायला तत्पर असायच्या.
तीच ही नंबर बावीस......आमच्या शारीरिक,  मानसिक ,भावनिक  भरण पोषणात यानंबरने बराच काही हातभार लावला आहे. त्या नकळत्या वयात   कळत  नकळत आम्ही मावशीला त्रासही दिलेला असावा.पण मावशीने कधी त्याची जाणीव करून दिली नाही.
कोणी तरी असे म्हटले आहे कि माय मरो आणि मावशी जगो.
छे छे ... हे मला  अजिबातच पटत नाही.
मला वाटते,
माय जगो आणि  मावशीही भरपूर जगो. दोघीही हव्यातच!!!
   .........  आज आई या जगात नाही .....मावशीही दुसऱ्या जागी स्थलांतरित झाली आहे.आईशिवाय ते  घर याची कल्पनाच मला करवत नही. पक्षी उडून गेलेल्या घरट्यासारखी ती दोनही घरे सुनी सुनी झाली आहेत.
वयाची बावीस वर्ष जिथे मुक्तपणे वावरण्यात घालवली तो परिसर आज मला परका,अनोळखी भासतो आहे. मला म्हणतो आहे ---------
----तेरा यहाँ  कोई नही...... के तेरा यहाँ  कोई.... नही.!!!!!!!
पण या दोघी बहिणींच्या  आयुष्याचा साक्षीदार  असणारा तो चौक अजूनही तसाच आहे !!!!.स्थितप्रज्ञासारखा
निर्विकार !!!!!.नऊ आणि बावीस नम्बरमधील दोन कुटुंबाना जोडणारा तो दुवा.....भूत आणि वर्तमानाचा  तोल सांभाळत उभा आहे!!!!!.........आमच्या भावंडांच्या हृदयातील बावीस टक्के भाग व्यापून!!!!!!
©नेहा देव 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा