शुक्रवार, ८ मे, २०२०

मनाच्याही मनातले...3) ग्रहण


3)  ग्रहण


         नेहा देव
 कोविड १९ च्या lock down चे सुरवातीचे दिवस. अचानकच अंगावर चालून आलेले घळघळीत रिकामपण. उद्दीष्टहीन चाललेला मोबाईलवरचा चाळा. you tube चे व्हिडिओ नजरेसमोरून घरंगळत जात होते. नजर एका नाटकाच्या शीर्षकावर स्थिरावली. नकळतच मी व्हिडिओ on  केला.  नाटक होते "काचेचा चंद्र" कलाकार शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर. मंतरल्याप्रमाणे   पूर्ण नाटक एका जागी खिळून ,एका बैठकीतच बघून घेतले . नाटक संपले! मन विषणण ,उदास झाले. संताप,क्रोध,द्वेष,तिरस्कार,खेद,शिसारी,घृणा.
 तमाम नकारात्मक भावनांनी मन ओथंबून उतू गेले.
          हे अक्षर अन अक्षर असेच घडले होते, जेंव्हा मी ते नाटक प्रथम बघितले होते.
          ती रविवारची सैलावलेली निवांत दुपार होती.कामाचा नियोजित कोटा समाधानकारक रित्या उरकून T.V.  समोर लवंडण्याचा प्लॅन  होता. रिमोट हातात घेऊन सहजच चॅनेल्स फिरवली.  तेव्हाही असाच अचानकपणे तो "काचेचा चन्द्र" समोर आला होता अन तेव्हाही विश्रान्ती सोडून एका बैठकीत तो बघितला होता.
असेच मन विषणण,उदास झाले होते. तोच संताप,तोच क्रोध,तोच द्वेष, तोच तिरस्कार, तोच खेद,तीच शिसारी आणि तीच घृणा.
उस्फूर्त  भावनांचा हा कल्लोळ  हे त्या साहित्यकृतीचे यश मानायचे कि अशी कथा हे माणुसकीचे अपयश समजायचे?
त्या नाटकांमागोमाग अनिवार्यपणे येणाऱ्या  अनावर भावनांच्या ज्वाळा.  हे सगळे असेच घडणार हे माहित असूनही दुसऱ्यांदा ते  नाटक मी का बघितले?प्रश्न अनुत्तरित राहणार हे माहित असूनही  हा प्रश्न मी स्वतः:ला विचारलाच.

काय आहे या नाटकात?
         कथेचा प्लॉट असा. ---गरीब ब्राह्मण  कुटुंबातील सोज्वळ साधी- भोळी मुलगी. संयोगाने, शाळेच्या मास्तरांच्या शिफारसीमुळे  नाटक सिनेमाक्षेत्रात प्रवेशते. तिच्या साथीला (खर तर  राशीला) असतो एक  नाकर्ता, सावत्र भाऊ. तिचे शक्य त्या सर्व प्रकारचे शोषण तो करत राहतो.
तिची वाताहत होत राहते. ती उध्वस्त होत राहाते . कोसळतच जाते. ..... मन शत शत विदीर्ण करणारी ही  शोकांतिका. 
           तोच अनुत्तरित करणारा प्रश्न-- मी ते नाटक परत का बघितले?
काय अनुभवण्यासाठी? माणूस पैशासाठी असंही  करू शकतो हे बघण्यासाठी??
जगात असं घडू शकत? पैसा पैसा पैसा!!!! हा पैसा ही  काय चीज आहे? हे काय गौडबंगाल आहे?
असेल!!!! अस घडतही असेल!!! या जगात काहीही घडू शकते!!!  
         वास्तवातून प्रेरणा घेऊन साहित्य घडते. साहित्यातून प्रेरणा घेऊन वर्तन घडते.
वास्तव-कल्पना-भावना-प्रेरणा-वर्तन आणि त्यातून उदयाला येणारे अपरिहार्य वास्तव.  बिंब आणि प्रतिबिंब.
वास्तवापासून सुरु होऊन वास्तवापर्यंत येऊन ठेपणारे  भास आभासाचे हे  वर्तुळ.
आणि अपरिहार्यपणे त्या भोवऱ्यात गरगरणारे आपण क्षुद्र जीव जंतू. 
  तो तिचा भाऊ (सावत्र ) असा का वागला?
  ठीक आहे असा प्रसंग होऊ शकतो ,असेही घडू शकते पण लेखकाने ते साहित्यात उतरवलेच का?
  ठीक आहे नाटककाराने  ते लिहिले पण कलाकारांनी ते स्टेज वर आणलेच का? ते ही  शरद पोंक्षेनि? त्यांच्या
  सारख्या बाप माणूस  कलाकाराने व्हिलन साकारलाच  का?
  ठीक आहे त्यांनी नाटक  केले पण मी ते पाहिले तरी का ?
  एकदा पाहिले  ते पाहिले.  पण मग दुसऱ्यांदा पाहिले तरी का? का??
 या विकृत भावनाचेही एक आकर्षण असते का? कि आपण असे वागायचे नाही असे स्वतःलाच बजावण्यासाठी आपण ते बघतो?
कि एक केवळ साहित्य कृती म्हणून ते बघतो? कि तो अनुभव घेतल्यावर आपल्या मनातील वाईट भावनांचा   आपण निचरा करून घेतो?कि आपल्या चांगुलपणावर आपणच शिक्कामोर्तब करून घेतो?
कोणते उत्तर बरोबर? कि सर्वच उत्तरे बरोबर ? कि कोणतेच उत्तर बरोबर नाही?
अनुत्तरित प्रश्न......
तुम्हाला उत्तर सापडल्यास मला द्याल??????
   ©नेहा देव 

1 टिप्पणी: