शनिवार, २० जून, २०२०

मनाच्याही मनातले ...7)अधुरी एक कहाणी

7अधुरी एक कहाणी 

आटपाट नगर होत 
चंदेरी......सोनेरी ... लखलखतं... 

साऱ्यांच्या स्वप्नातलं ते गाव होत
ताऱ्यांचे त्यावर नाव होत 
चमचमाट...झगझगाट.... डोळे दिपवणारा होता.
अप्सरांचा तिथे वावर होता ..गंधर्व ,यक्षांचा  वास होता... 
तिथे प्रतिभा खुलत होती 
तिथे कला फुलत होती 
मोहक त्यांची फळे होती.
युगामागून युगे सरत होती 
कला तिथे  बहरतच  होती 
स्वर्गीय संगीत होते,  मधुर गीते  होती ...
भावपूर्ण कथा होत्या.
लाजवाब त्यांचा अभिनय होता,
अवघे जग त्यावर होते फिदा.
कलियुग आले आणि नक्षत्रांच्या त्या गावाला कोणा नतद्रष्टाची नजर लागली.
कलेचा बाजार सुरु झाला,देहाचा व्यापार तिथे होऊ लागला
नशेचा सुळसुळाट झाला.गुंडांचा तो अड्डा झाला. 
तळवे चाटू चमच्यांना ऊत आला 
राजपुत्राच्या मुखवट्याआड श्वापदांचा वावर सुरु झाला.
म्हणाले ही सगळी आमचीच  जागीर.
कोणाच्या बापाची नाही आम्हाला फिकीर 
त्यांनी केले संगनमत 
मिळून रचला एक कट 
त्यांनी एक टोळी केली.
उपऱ्याना यायला मनाई केली  
कोण येतो बघूच इथं आम्ही
 त्याची हिम्मत करू खच्ची
टोचे मारून करू आम्ही घायाळ
गिधाडांचे आम्ही वारसदार.
इथे चालेल फक्त आमचा कायदा. मागचे सारे आता  विसरा
आम्ही करू तेवढेच बघा.... त्यालाच आता "कला" म्हणा 
तिथे एक तरुण खेडूत आला. देखणा.. उमदा... भोळाभाबडा 
डोळ्यात हजार  स्वप्ने त्याच्या,
म्हणाला मी पण होईन राजपुत्र ...
माझ्यामधेही आहे प्रतिभेचे अंग.
पहा तर माझ्या कलेचा आविष्कार
मलाही द्या फुलण्याचा अधिकार..
 हा   हा    हा   
श्वापदांनी विकट हास्य केले.
तुझ्यासारखे आम्ही खूप पचवले 
त्याला मध्य रिंगणात  घेरले.
रानकुत्र्यासारखा केला त्यावर हल्ला.
बेसावध बिचारा घायाळ  झाला.
जखमी, अर्धमेला  तडफडू लागला.
मदतीला नाही कोणी  त्याच्या.
स्वप्ने राहिली अर्धीच ...म्हणाला ही जिंदगी  नाही खरी.
ईश्वरा ती तुझी तुलाच भली.
बुद्धिमान त्याला हे कळलेच नाही.
आपल्यासारख्यानी यायची ही जागाच नाही
त्याच्या नावात होती शांती....हृदयात मात्र अशांती 
हृदयात  माजली वादळे अनावर 
 निसटत्या क्षणी  त्याने जीवन केलं अर्पण 
नावातील शांतता आणखीनच  गूढगर्भ झाली........
त्याला हे कळायला हवे होते ....
या बगळ्यामध्ये होता तो राजहंस
गिधाडांमधला तो वैनतेय .......
अजाणता काही घडून  गेले,डोळ्यांमधले  स्वप्न विरून गेले.
 अविवेक दुराचार उतू गेला.निर्दय कली मातून गेला.
श्वापदे झाली नरभक्षी.... रया गेली नगरीची 
.........
कहाणी राहिली अर्धीच .....असफल  आणि अपूर्ण 
असफल ...... आणि 
अपूर्ण ..........

©नेहा देव 

शुक्रवार, १९ जून, २०२०

मनाच्याही मनातले ...6) मागणे

मनाच्याही मनातले 
6) मागणे

वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी आयुष्याचा ताळेबंद मांडताना 
 कधीकधी तीव्रतेने वाटते की
ते परमेश्वर नावाचे प्रकरण मला  एकदा भेटावेच !!!! 
त्याला गदागदा हलवून ,खडसावूंन विचारायचे आहे. 
का?   का??     का रे बाबा का???
का  तू मला असे सर्वच बाबतीत मध्यम .....सर्वसाधारण...बरे... या पातळीवरच ठेवलेस?
एखाद्या  बाबतीत तरी उत्तम या टोकाचे गुण  मला द्यायला काय हरकत होती?.एखाद्या  बाबतीत तरी..........?
मला आवडले असते कि ते ...   
ईश्वरी सौंदर्य-मधुबालासारखे..  
मोहकता माधुरीसारखी...
परमोच्च मधुर  आवाज लतादीदींसारखा...
खेळातील अफाट कौशल्य सुनील,सचिन सारखे...
अभिनय दिलीपकुमार सारखा...  
नृत्य कौशल्य गोपी सारखे....
विनोदी लेखनाची अलौकिक प्रतिभा पु. ल. सारखी...
काव्यामध्ये तर किती नावे घ्यावीत?.
नेतृत्व वाजपेयी सारखे ,नरेंद्रांसारखे....
कर्तृत्व धीरूभाई सारखे....
श्रीमंती लक्ष्मी मित्तलासारखी....
समाजसेवा आमटेंसारखी.....
राषट्रभक्ती सावरकरांसारखी............
छे छे यापैकी काहीच माझ्याकडे  नाही.चमकदार, अलौकिक, असामान्य असे काहीच नाही.
सर्वच बाबतीत मी आपली  बरी !!! साधारण!!! ठीक ठीक!!!! मध्यम!!!
माझी झोळी  देवाने अर्धी रितीच ठेवली.  
तमाम मध्यमवर्गीयांची  ब्रँड अँबॅसिडर  सारखी मी आपली मध्येच ....मधल्या सीमारेखेवरच  उभी ..... 
का?   का??
या साऱ्या उत्तम लोकांचे  अतुलनीय कार्य बघताना,कलांचा आस्वाद घेताना आत कुठेतरी सलत राहतेच, हे
मी का करूशकत नाही??? त्या जागी मी का नाही???
हे असे काहीतरी उत्तम, अलौकिक झाल्यावर काय वाटत असेल माणसाला? काय भावना असतील?
तुकोबा म्हणतात .....
जया अंगी  मोठेपण  तया यातना  कठीण .....
असू  दे. त्या यातनांसह  ते मोठेपण मी हसत स्वीकारले असते.
मला हवा होता तो अनुभव.... याच जीवनात!!!
चौदा विद्या,चौसष्ठ कला,हजारॊ प्रकाराचे खेळ, शारीरिक गुण वैशिष्ठ्ये,कल्पकता, सृजनशीलता,उद्यमशीलता,तांत्रिक कौशल्य, राष्ट्रप्रेम, समाजकार्य,.........अगणित गुण...
कितीतरी मोठा span ईश्वरासमोर होता.पण त्या पैकी  एखाद्या गुणासंदर्भात अलौकिक या बिंदूवर मला न्यावे असे काही त्याला वाटले नाही......दिव्यत्वाचा परिसस्पर्श मला झालाच नाही ... माझे नशीब ....
लाखो तारे आसमानमे, एक मगर ढुंढे ना  मिला.......अशी माझी अवस्था .
कदाचित त्याला लागणारी आत्यन्तिक प्रेरणा, जिद्द,कष्ट, उद्दिष्टाला वाहून घेण्याची  तयारी,धडाडी, धडपड,हिम्मत,कर्तृत्व,धाडस ...यापैकी कोणतेच गुण पुरेशा प्रमाणात माझ्यात नाहीत.
खरी गोची तिथेच  आहे ...माझे गाऱ्हाणे मुळात तेच आहे. हे सर्व गुण 
देवाने मला  पुरेसे दिलेच नाहीत. त्यावर कडी म्हणजे  बलवत्तर नशीबही नाही. 
 केशवसुत  म्हणून गेले कि---- प्राप्त  काळ हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा......
अरे पण कशी? कशी  खोदा? छिन्नी हातोडा तर चालवता यायला हवा.
हा कंजूषपणा माझ्या बाबतीत त्याने का केला?
रूप बेतास बात -आता पन्नाशीनंतर सुमार या विशेषणाकडे जाणारे....उंची मध्यम...बुद्धिमत्ता थोडीशी बरी.त्यामुळे शिक्षण जरा above average..पण व्यवहारात त्याचे रूपांतर पैशात करण्याची चतुराई नाही. त्यामुळे कमाई मध्यम , अर्थातच श्रीमंती मध्यम, उत्तम  गाउ असे  म्हटले तर आवाज साधारण...  इतर कलांच्या   बाबतीत हाच प्रकार. निसर्ग नियमाने दोन अपत्य झाली. पण त्यांना घडवण्यातही खूप मोठे कर्तृत्व नाहीच.
आजी आजोबांच्या छत्र -छायेखाली  स्वतःच  वाढत गेली बिचारी.
एकूण सर्वच मामला ..... मध्यम,मध्यम,मध्यम........... मध्यम वर्गीयांची ब्रँड अम्बॅसॅडर!!!!!!
याविचाराने क्वचित खिन्न व्हायला होते.  अरेरे.... कसे हे माझे  जीवन? 
जन्माला आले ,जगले  आणि एक दिवस मरून जणार!!!!  . ....ना  कोणाला खंत  ना खेद. 
आपण निघून गेल्यावर मागे काय राहणार? 
काय राहणार मागे ? 
कोणत्याच पाऊलखुणा नाहीत...... कोणतेच ठसे नाहीत......
जन पळभर म्हणतील हाय हाय !!!!! 
नंतर काय ?
कसे हे किडा मुंगी सारखे जगणे ?
ये जिना भी कोई जिना है?
नाही म्हणायला या अन्यायावर उतारा म्हणून दोन गुण देऊन देवाने उ:शाप दिला आहे . 
एक  म्हणजे आत्यंतिक सहनशीलता ( आईकडून आलेला  वारसा हक्क--पण आईपेक्षा हा गुण कमीच )
आणि दुसरा म्हणजे आत्यन्तिक संवेदनशीलता !!!!
सहनशीलतेमुळे वाद कमी होतात.जीवन मध्यममार्गावर,  मध्यम गतीने  चालूच राहते.
पण संवेदना  मात्र वेदनाच देतात .. हा उ:शाप .. का शाप ?
या संवेदनशीलतेमुळे आजू बाजूला घडणारे सर्वच जाणवत राहते, मनात शोषले जाते , आत झिरपत जाते ,खूप काही  खुपत राहते , ठसठसत राहते. या संवेदनांचे करायचे काय?? नटसम्राटांच्या वेदनेसारखीच त्याची अवस्था.त्या संवेदनांना  ना हात ना पाय. केवळ  धड !!!!  केवळ आणि केवळ असहाय्य !!!
या असहाय्यतेच्या जखमेसह जगावेच लागते.......अश्वत्थाम्यासारखे.
करणार काय?.
मग  निरुपायाने  स्वतःलाच  समजवावे  लागते.
ऐ खुदा हर फैसला तेरा मुझे मंजूर है !
सामने तेरे  तेरा बंदा बहुत मजबूर है.......
असे  म्हणत मीच मला  जगवत  ठेवते!!!!!!
नाही !!! त्या धडधाकट भिकाऱ्या सारखे रडगाणे गाणाऱ्यातील  नाही मी..... ज्याला रोगी राजाने त्याच्या  अनमोल निरोगी शरीराची किंमत जाणवून दिली होती.....
दूर कुठून तरी कानावर येणाऱ्या सुरात माझ्या मनाच्या कोपऱ्यातील सूर मिसळून जातात.... 
माझे जीवन गाणे.... 
व्यथा असो आनंद असू दे....... 
जे काही ईश्वराने दिले त्याचा चांगला वापर करत मध्यम मार्गावर मध्यम  गतीने जगणे चालूच ठेवणार मी..
अर्ध्या भरलेल्या झोळीच्या शिदोरीवर जीव जगवत आणि जागवत......
ओबडधोबड का होईना जसं  जमेल तसं  माणुसकीच लेणं खोदत राहणारच मी .....  
तेवढे माणुसकीचे धडे मी नक्कीच शिकले आई बाबांकडून  !!!!!

पण कधीतरी असेही घडते .... माझ्या प्रश्नाचे उत्तर  माझे  मलाच उमजते........मनात चमकून जाते ......
माझे  मलाच.... .....उमगते .....
........उत्तम वक्त्याला दशसहस्त्र श्रोते लागतात,प्रभावी नेत्याला लाखो अनुयायी लागतात, उत्तम अभिनेत्याला शेकडो चाहते  लागतात., प्रतिभावान  लेखकाला असंख्य वाचक लागतात...  .... ते  व्हायचे कोणी? समाजातील बऱ्या वाईटाचा तोल सांभाळायचा  कोणी? समाज स्थिर ठेवायचा कोणी?प्रामाणिकपणे टॅक्स देऊन देश चालवायचा कोणी?श्रीमंत आणि गरीब यामधील दरी सांधायची कोणी?
माझ्यासारख्या मध्यम मार्गी मनुष्यानीच!!!!!!
मग तो  प्रसामान्य संभव वक्र डोळ्यासमोर येतो .त्यात मध्यस्थानी आलेख खूप वरजातो......शिखर गाठतो... एकदम टोकाला जातो.त्या टोकावर आपण सर्व मध्यम वर्गीय असतो. हा मध्य.... मध्यभागी राहून  सर्व पसाऱ्याचा तोल आपल्या शिरावर घेऊन ताटकळत उभा असतो. हीच तर मेख असते. इथे ते टोक मध्यमवर्गीयांनी  गाठलेले  असतें. 

स्वतःच निर्माण केलेल्या अति  उत्तम आणि अति निकृष्ट या दोन टोकांमधले अंतर जुळवून घ्यायला आणि त्याचा तोल सांभाळायला देवालाही अवघड गेले असते आणि म्हणूनच खूप मोठ्या संख्येने माझ्यासारख्या मध्यम मार्गी मनुष्यांची योजना त्यांनी केली असावी.
हा परत आपला माझा मध्यम विचार!!!!!! 
मध्यम बुद्धीला सुचलेला!!!!

आपल्या ब्याऐंशी  वर्षाच्या आयुष्यात लाखो संकटे झेलत हसतमुखाने जगणारी माझी मध्यमवर्गीय आई नेहमी म्हणायची ....याजन्मात आमचे सगळे पूर्वजन्मीचे भोग आम्ही भोगून संपवणार...... पुढचा जन्म 
 आमचा उत्तम असणार!!!
दुर्दम्य आशावाद!!!! 
...आता नक्कीच  ती कुठेतरी जन्मली असणार!!!!!
परमेश्वरा हे एक मागणे तरी पुरे करशील? तिचे म्हणणे खरे करशील?
आणि तिच्याच पोटी पुन्हा जन्म देऊन मला  फक्त एक  उत्तम माणूस करशील? मग मी  मानव्याचे सुंदर शिल्प त्यात खोदेन.... मग  मी मेल्यावर माणसे म्हणतील....... एक उत्तम आयुष्य संपन्न झाले ....
एवढे करशील ?
निदान पुढच्या जन्मी तरी?

©नेहा देव 
 


बुधवार, ३ जून, २०२०

मनाच्याही मनातले... 5) बावीस

मनाच्याही मनातले....
         5)   बावीस
           बावीस हा  दिसताक्षणी आवडेल असा काही आकर्षक आकडा नाही.
 बावीस हा काही माझा लकी नंबरही नाही. माझा जन्मदिनांकही नाही. आमच्या पैकीं कोणाचाच नाही. किंवा तो काही खास पासवर्ड किंवा कोडवर्डही नाही.एखाद्या  कमनीय ललनेच्या मापाशीही हा संबंधित नाही.
पण या  नम्बरचे आमच्या लहानपणाशी बरेच काही बंधअनुबंध जुळलेले आहेत.
आमच्या चारही भावंडांच्या लहानपणातील आयुष्याचा बावीसच नव्हे  तर चव्वेचाळीस टक्के भाग या बावीस नंबरने व्यापला होता.
           लोकमान्यनगरमध्ये आमच्या बिल्डिंगचा नंबर होता नऊ आणि आमच्या समोरची बिल्डिंग सोडून दोन बिल्डिंगच्या नंतर एका   छोट्याश्या  चौकांच्या पुढे  होती ....बिल्डिंग  नंबर  बावीस.... 
आता इथल्या बिल्डींग्जना कोणत्या क्रमाने असे नंबर दिले होते, हा एक मोठा संशोधनाचा विषय  ठरू  शकतो.
          उच्च शिक्षण घेताना संशोधन या विषयाशी  ओळख झाली आणि त्यात random--यादृच्छिक  ही नवी संकल्पना कानावर पडली. random -यादृच्छिक म्हणजे नेमके काय याचा प्रत्यक्ष अनुभव लोकमान्यनगरच्या बिल्डिंगना  दिलेले नंबर  ज्या क्रमाने  दिले आहेत त्यावरून कोणालाही पटकन समजेल. 
          कोणताही ठराविक नियम न पाळता अक्षरशः मनाला वाटतील त्या पद्धतीने या बिल्डींग्सना नंबर दिलेले होते. नवागतास पुरेपूर गोंधळात टाकून वांच्छित पत्याचा पत्ता लागू द्यायचाच नाही असा बहुधा बिल्डरने  चंग बांधला  असावा .
          तर बिल्डिंग नंबर  बावीस.... या मध्ये आमची मावशी तिच्या तीन मुलींबरोबर रहायची. परिस्थितीची गरज म्हणून मावशी नोकरीला जायची. मग दिवसभर त्या तीन मावसबहिणीसह तो बावीस नंबर मधील तीन खोल्यांचा आख्खा ब्लॉक आमच्या  ताब्यात असायचा . तो म्हणजे आमच्या सर्व भावंडांचा मुक्त पणे खेळायचा अड्डा असायचा.
          त्या बावीस नंबरने  वेगवेगळ्या प्रकारे आमचे लहानपण समृद्ध केले. .
          मावशीचा स्वयंपाक मस्त मसालेदार असायचा. तिच्या हातच्या  आमटीची , वांग्याच्या भाजीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. आमच्याकडे  घरी आज्जी, बाबा यांच्या सततच्या आजारपणाने पथ्याचाच  स्वयंपाक  असायचा. मला पहिल्यापासून मसालेदार चमचमित जेवणाची आवड. पण आई ते काही करू शकत नसे. आमच्याकडे तेलाची इतकी टोकाची काटकसर असायची की जास्त तेल एकावेळेस आणले तर आई भराभर जास्त वापरून संपवेल म्हणून अक्षरशः दर  दोन- तीन दिवसांनी अर्धा - पाव किलो तेल आम्ही मुलेच आणायचो. (माझी ही मसालेदार तेलकट खाण्याची आवड आईने मनात ठेवली होती आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही याची खंतही.... माझे लग्न झाल्यानंतर एक दिवस आईकडून डबा घेवून जायची वेळ आली होती. कॉलेज मध्ये गेल्यावर डबा उघडला आणि पाहिले तर भाजी तेलाने आणि पोळी तुपाने ओथंबली होती.. ...आणि माझे डोळे पाण्याने....... )
          तर या बावीस नंबर मध्ये मावशीच्या हाताचा चमचमीत स्वयंपाक हे एक आकर्षण होतेच.
दुसरे म्हणजे,मावशीने वाचनालय लावले होते. तिच्या घरी मासिके, कादंबऱ्या असायच्या.
त्या काळात कोणताही लेखी चिठोरा लेखकाने माझ्यासाठीच लिहिला आहे आणि तो न वाचला तर पाप लागेल अशा   भावनेने  मी अक्षरश:जे मिळेल ते वाचत सुटायचे. त्या अर्धवट वयात जे वाचायला हवे ते आणि नको असेही. त्यामुळे जरा लवकरच शहाणपण आले होते. बाकीचे सर्व खेळात रमलेले असताना मी मात्र अनेक वेळा पुस्तकात डोके खुपसून बसलेली असायची.
      तर माझ्यासाठी ते एक मोठे आकर्षण होते .पुस्तके,मासिके,वर्तमानपत्रे असा बराच खजिना.
परीक्षेच्या काळात अभ्यास आम्ही इथेच करायचो. रिकामपणाचे खेळ आणि इतर छंदही  आम्ही इथेच जोपासले.तिथेच आमचे पत्ते,कैरम,सागरगोटे, भातुकली, लपाछपी असे तमाम खेळ चालायचे. तेव्हा दूरदर्शन (आपला T .V ) नुकतेच  अस्तित्वात आले होते.  आमच्या आधी मावशीकडे T .V .आला होता. तेव्हाही श्वेतांबरा,छायागीत बघण्यासाठी आम्ही तिच्याकडे तळ ठोकून  असायचो ,असे स्मरते . 

आमची आई अतिशय मवाळ.ती चुकूनही कोणाला आवाज चढवून  रागावलेली मला  आठवत नाही.
त्या मानाने मावशी भलतीच कडक ! फटकन रागे भरायची!!
 तिची जरा भीती वाटायची पण ती नसताना आम्ही तिच्या घरात मुक्तपणे वावरायचो.
तीच ही नंबर बावीस.......
आमच्याकडे नऊ नंबरच्या अडीच खोल्यामध्ये मूळची सात ,अधिक  दीर्घ काळ राहावयास आलेला चुलत भाऊ ,अधिक काहीनाकाही निमित्ताने येणारे काका, आत्या, इतर नातेवाईक असे एकावेळेस दहा- बारा लोक  सहज असायचे. मग साहजिकच अडचण ही असायचीच. तेव्हाही हे मावशीचे घर म्हणजे आमची आधाराची गोष्ट असायची. आमच्या घरच्या  अडीअडचणीच्या वेळी रात्री झोपायला जाण्याचीहि ती हक्काची जागा होती.
आई आणि मावशी दोघीही बहिणी भिन्न स्वभावाच्या असल्या, तरी त्यांच्यात खूप सख्यं होते . अडीअडचणीला दोघीही एकमेकींना मदत करायला, सावरायला तत्पर असायच्या.
तीच ही नंबर बावीस......आमच्या शारीरिक,  मानसिक ,भावनिक  भरण पोषणात यानंबरने बराच काही हातभार लावला आहे. त्या नकळत्या वयात   कळत  नकळत आम्ही मावशीला त्रासही दिलेला असावा.पण मावशीने कधी त्याची जाणीव करून दिली नाही.
कोणी तरी असे म्हटले आहे कि माय मरो आणि मावशी जगो.
छे छे ... हे मला  अजिबातच पटत नाही.
मला वाटते,
माय जगो आणि  मावशीही भरपूर जगो. दोघीही हव्यातच!!!
   .........  आज आई या जगात नाही .....मावशीही दुसऱ्या जागी स्थलांतरित झाली आहे.आईशिवाय ते  घर याची कल्पनाच मला करवत नही. पक्षी उडून गेलेल्या घरट्यासारखी ती दोनही घरे सुनी सुनी झाली आहेत.
वयाची बावीस वर्ष जिथे मुक्तपणे वावरण्यात घालवली तो परिसर आज मला परका,अनोळखी भासतो आहे. मला म्हणतो आहे ---------
----तेरा यहाँ  कोई नही...... के तेरा यहाँ  कोई.... नही.!!!!!!!
पण या दोघी बहिणींच्या  आयुष्याचा साक्षीदार  असणारा तो चौक अजूनही तसाच आहे !!!!.स्थितप्रज्ञासारखा
निर्विकार !!!!!.नऊ आणि बावीस नम्बरमधील दोन कुटुंबाना जोडणारा तो दुवा.....भूत आणि वर्तमानाचा  तोल सांभाळत उभा आहे!!!!!.........आमच्या भावंडांच्या हृदयातील बावीस टक्के भाग व्यापून!!!!!!
©नेहा देव