शनिवार, २० जून, २०२०

मनाच्याही मनातले ...7)अधुरी एक कहाणी

7अधुरी एक कहाणी 

आटपाट नगर होत 
चंदेरी......सोनेरी ... लखलखतं... 

साऱ्यांच्या स्वप्नातलं ते गाव होत
ताऱ्यांचे त्यावर नाव होत 
चमचमाट...झगझगाट.... डोळे दिपवणारा होता.
अप्सरांचा तिथे वावर होता ..गंधर्व ,यक्षांचा  वास होता... 
तिथे प्रतिभा खुलत होती 
तिथे कला फुलत होती 
मोहक त्यांची फळे होती.
युगामागून युगे सरत होती 
कला तिथे  बहरतच  होती 
स्वर्गीय संगीत होते,  मधुर गीते  होती ...
भावपूर्ण कथा होत्या.
लाजवाब त्यांचा अभिनय होता,
अवघे जग त्यावर होते फिदा.
कलियुग आले आणि नक्षत्रांच्या त्या गावाला कोणा नतद्रष्टाची नजर लागली.
कलेचा बाजार सुरु झाला,देहाचा व्यापार तिथे होऊ लागला
नशेचा सुळसुळाट झाला.गुंडांचा तो अड्डा झाला. 
तळवे चाटू चमच्यांना ऊत आला 
राजपुत्राच्या मुखवट्याआड श्वापदांचा वावर सुरु झाला.
म्हणाले ही सगळी आमचीच  जागीर.
कोणाच्या बापाची नाही आम्हाला फिकीर 
त्यांनी केले संगनमत 
मिळून रचला एक कट 
त्यांनी एक टोळी केली.
उपऱ्याना यायला मनाई केली  
कोण येतो बघूच इथं आम्ही
 त्याची हिम्मत करू खच्ची
टोचे मारून करू आम्ही घायाळ
गिधाडांचे आम्ही वारसदार.
इथे चालेल फक्त आमचा कायदा. मागचे सारे आता  विसरा
आम्ही करू तेवढेच बघा.... त्यालाच आता "कला" म्हणा 
तिथे एक तरुण खेडूत आला. देखणा.. उमदा... भोळाभाबडा 
डोळ्यात हजार  स्वप्ने त्याच्या,
म्हणाला मी पण होईन राजपुत्र ...
माझ्यामधेही आहे प्रतिभेचे अंग.
पहा तर माझ्या कलेचा आविष्कार
मलाही द्या फुलण्याचा अधिकार..
 हा   हा    हा   
श्वापदांनी विकट हास्य केले.
तुझ्यासारखे आम्ही खूप पचवले 
त्याला मध्य रिंगणात  घेरले.
रानकुत्र्यासारखा केला त्यावर हल्ला.
बेसावध बिचारा घायाळ  झाला.
जखमी, अर्धमेला  तडफडू लागला.
मदतीला नाही कोणी  त्याच्या.
स्वप्ने राहिली अर्धीच ...म्हणाला ही जिंदगी  नाही खरी.
ईश्वरा ती तुझी तुलाच भली.
बुद्धिमान त्याला हे कळलेच नाही.
आपल्यासारख्यानी यायची ही जागाच नाही
त्याच्या नावात होती शांती....हृदयात मात्र अशांती 
हृदयात  माजली वादळे अनावर 
 निसटत्या क्षणी  त्याने जीवन केलं अर्पण 
नावातील शांतता आणखीनच  गूढगर्भ झाली........
त्याला हे कळायला हवे होते ....
या बगळ्यामध्ये होता तो राजहंस
गिधाडांमधला तो वैनतेय .......
अजाणता काही घडून  गेले,डोळ्यांमधले  स्वप्न विरून गेले.
 अविवेक दुराचार उतू गेला.निर्दय कली मातून गेला.
श्वापदे झाली नरभक्षी.... रया गेली नगरीची 
.........
कहाणी राहिली अर्धीच .....असफल  आणि अपूर्ण 
असफल ...... आणि 
अपूर्ण ..........

©नेहा देव 

७ टिप्पण्या:

  1. खुपच छान, गहन, अर्थगर्भी, खूप वेगवेगळ्या संदर्भांना लागू पडेल अशी.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान मांडले आहे ,मनाला चटका लावून जाते

    उत्तर द्याहटवा
  3. आजच्या युगाला योग्य आहे, विचार करायला लावणारी

    उत्तर द्याहटवा